रविवार, २२ ऑगस्ट, २०२१
|| रक्षाबंधनाविषयी दोन शब्द ||रक्षाबंधनात असं गृहीत धरलेलं आहे की मुलगी अबला असल्याने भावानं तिचं संरक्षण करायचं. आता या धारणा काही प्रागतिक म्हणता येणार नाहीत. पण एवढंच खरं नाहीए. काळानुसार धारणा बदलत जात असतात. अलिकडिल काळात मी जे पाहतोय त्यात मला 'संरक्षण' या भावनेचा प्राधान्यक्रम ढासळतो आहे, असे दिसते. हा आणि भाउबीज दोन्ही सण हे मुख्यत: भावा-बहिणीच्या प्रेमाची प्रतिकं बनताहेत. हळूहळू का होइना ही प्रक्रिया घडते आहे. कर्मकांड नि सण-उत्सव या बाबतीत या गोष्टी नेहमीच घडतात. ज्यासाठी ते कर्मकांड अगोदर निर्माण झालेले असते तो आशय मागे पडून नवा आशय त्यात भरला जात असतो. (हा बदल प्रत्येक वेळी चांगल्या दिशेनेच होइल असं मात्र सांगता येत नाही.) याची किती तरी उदाहरणे देता येतील. एक उदाहरण देवाला नारळ फोडण्याचे देता येइल. काही अभ्यासकांच्या मते ते नरबळीचं प्रतिक आहे. त्या नारळाला डोळे असतात. त्याला शेंडी असते. ती विशिष्ट दिशेला असावी लागते. आणि त्याची 'कवटी' आपण फोडतो. कदाचित खरोखरच नरबळीपासून नारळ फोडण्याची प्रथा उत्क्रांत झालेली असू शकते. पण आज कोणाला त्या मूळ धारणेची आठवण सुद्धा नाही. मुख्य म्हणजे नरबळी ते नारळ हा प्रवास तर विधायकच म्हणावा लागेल. सांगायचा मुद्दा असा की, जोवर एखादे कर्मकांड किंवा सण-उत्सव हे विघातक ठरत नाही तोवर त्यास विरोध करू नये, असे माझे मत आहे. कित्येक सण म्हणा, कर्मकांडं म्हणा ही फार वेगळ्या प्रकारची असतात. ते एक प्रकारचे 'भावकाव्य' असते. रक्षाबंधन तर नक्कीच तसे आहे. ते नष्ट करून उगीच मानवी जीवनात कोरडेपणा आणू नये. ते अधिक सुंदर, अधिक उन्नत कसे करता येइल ते पहावे. प्राध्यापक - श्री. संतोष शेलार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा